Wednesday, 18 October 2023

डोह

उन्हातून कातून तुकडा काढावा तसे भासणारे पांढरेशुभ्र गोड दूध, अंगात खूप ताकद भरवणारा रानाचा हिरवा वास, हिरव्याकाळ्या गूढ-जिवंत सावल्या, मऊ पण घट्ट असे देवीचे काळेशार दगडी अंग, पोर मेल्याच्या दुःखाने माणसासारखा शोक करणाऱ्या माकडिणी, शेळीच्या मुताचा खमंग वास, लुटुलुटु चालत ऊन्ह खायला येणारे कासव, मोरीच्या भोकातून येणारा चिवचिवता तांबूसकोवळा प्रकाश, पांढऱ्या मातीने सारवलेल्या भिंतीत तापवून वाकवलेल्या बांगडीच्या काचा रुतवून केलेली हिरवीगार चमचमती वेल, चांदी पसरल्यासारखे दिसणारे स्तब्ध पाणी, कुणीतरी पलीकडे जावे तशी सहज स्वप्नात जाणारी चिंगुआजी... 

श्रीनिवास कुलकर्णींचं 'डोह' वाचताना किती प्रतिमा पिऊन घ्याव्यात नि किती नाही, असं काहीतरी होत होतं. पण मला किंचित जळफळता रागही येत होता. 

औंदुबर या तीर्थक्षेत्राच्या गावी लेखकाचं बालपण गेलं. त्या काळातल्या आठवणींची ही चित्रं आहेत. त्यांचं लालित्य, प्रतिमांचं सौंदर्य - श्रीमंती, भाषेचा गोडवा आणि अर्थवाहीपण, बघता बघता प्रतिमांच्या पुलावरून अर्थानिरर्थाच्या पल्याड गूढाच्या प्रदेशात नेणारी त्यांची जादू... हे सगळं वादातीत आहे. त्याबद्दल 'डोह' पुष्कळ वाखाणलंही गेलं आहे. त्यातलं वानरांचं, वाघळांचं, गाईम्हशींचं, शेळ्यामेंढ्यांचं, झाडाझुडपांचं, रानावनांचं, दगडमातीचं, ऊनसावल्यांचं, पाखरापिल्लांचं, देवाधर्माचं, माणसांचं आणि सापांचं विश्व लेखकाच्या नजरेनं बघताना स्तिमित व्हायला होतं, स्वप्नात गेल्यासारखं होतं, हे सारं संपूच नयेसं वाटतं... 

पण हे विश्व आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे, आपल्याला ते या शब्दांच्या कृत्रिम खिडकीतूनच बघावं लागणार, तितका आणि तितकाच रस्ता या गेल्या पिढीतल्या माणसांनी शिल्लक ठेवला आहे... असं काहीतरी मला वाटत राहिलं. पुष्कळ श्रीमंत पण उधळपट्टीने खंक होऊन बसलेल्या बेजबाबदार बापाच्या पोटच्या मुलांना वाटावं, तसं. प्रिव्हिलेज्ड असणं वा नसणं हे काय फक्त जतिनिहाय वा आर्थिक स्थितिनिहाय असतं थोडंच? आपल्या आधीच्या पिढ्यांमधली, मन भरून निसर्ग उपभोगलेली आणि आता आपल्याकरता हे सिमेंट-धूर-डॉल्बीचं जग ठेवून गेलेली माणसंही प्रिव्हिलेज्डच असतात. आपली सगळी पिढीच या बाबतीत दलित-वंचित... असा तो राग. 

वास्तविक मी तद्दन शहरी व्यक्ती आहे. मला खेडेगाव आणि तिथल्या आयुष्याचे कढ कदापि येत नाहीत. कुठल्याही मुलानं आपल्या भवतालातल्या, त्याच्याकरता 'नैसर्गिक'च असलेल्या वास्तुविशेषांचे, वस्तुविशेषांचे, माणसा-झाडा-जीवांचे, आणि वासा-आवाजांचे सगळे रंग टिपून घ्यावेत, तसं मी शहर टिपून घेत आले आहे. तोही निसर्गच आहे हे ठासून सांगत, त्याचं जिवंतपण भोगत आले आहे. पुढेही आणि इतर अवकाशांमध्येही माणसं हे करतीलच. पण तरी - हे जे काही श्रीमंत, संपृक्त, व्यामिश्र जग होतं, ते लोपलं हे उरतंच. त्याचा हा विषाद.

श्रीनिवास कुलकर्णींची इतर दोन पुस्तकं वाचताना त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांच्या तुलनेत तरुणपणीच्या अनुभवांमध्ये येत गेलेलं पोकळपण, तेच-ते-पण, बळंच-गूढत्व बघून जरा विटायला झालं. पण त्यानं 'डोह' आणि त्यातल्या विश्वाबद्दल वाटणारा मत्सर कोमट झाला नाही. तो धारदारपणे सलत राहावा, इतकी त्या पुस्तकाची धार जिवंत आहे. 

डोह

श्रीनिवास कुलकर्णी

मौज प्रकाशन

प्रथमावृत्ती १९६५

Wednesday, 4 October 2023

'इतिहासाचे साक्षीदार' आणि इतर पुस्तकं

एखादं पुस्तक वाचताना त्याच्या प्रकृतीच्या, त्याच्या विषयातल्या, आणि त्याच्या जवळच्या अनेक विषयांची आठवण जागी होत जाण्याचा अनुभव कमी वेळा येतो. मुकुंद कुळ्यांच्या इतिहासाचे साक्षीदारया छोटेखानी पुस्तकानं तो अनुभव दिला. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेलं हे पुस्तक मराठेकालीन संस्कृतीच्या जडबाजूविषयी माहिती पुरवतं.

मराठ्यांनी महाराष्ट्रात आणि भारतभर नद्यांवर बांधवलेले घाट, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, त्यांचे उपयोग आणि सौंदर्य, त्यांना लगडून असलेल्या वदंता आणि कहाण्या. महाराष्ट्रामधल्या बांधवून घेतलेल्या बारवा उर्फ बांधीव विहिरी आणि राजस्थान-गुजरातशी तुलना करता दिसणारा त्यांचा साधेपणा.  मराठाकालीन वस्त्रप्रावरणं, दागदागिने, त्यांच्यामधली कलाकुसर-शौकीनपणा-श्रीमंती आणि उपयुक्तता. महराष्ट्रातले विशेषतः पेशवेकालीन वाडे आणि त्यांच्या रचना. खास मराठ्यांनी वापरात आणवलेली, लोकप्रिय केलेली, गाजवलेली शस्त्रं – भाले-तलवारी-बिचवे-वाघनखं-कट्यारी आणि अर्थात दांडपट्टा. त्यांची वैशिष्ट्यं, गुणदोष, मर्यादा आणि बलस्थानं. त्यांच्यासह पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जिवा महालाच्या आणि अफझलखानाच्या आणि शिवरायांच्या गोष्टी. आणि पानपतावर दगा देणार्‍या आणि मराठ्यांना कायम हुलकावणी देत आलेल्या जडशीळ तोफा... हे इतिहासाचे साक्षीदारमधले कुळ्यांनी घेतलेले विषय. त्यात इतर ऐतिहासिक तपशील वेळोवेळी येत असले, तरी मुख्य भर मराठाकालीन इतिहासावर आहे. 

त्यामुळे ते वाचताना शिवकालीन महाराष्ट्र’ (राजहंस प्रकाशन) या अ. रा. कुलकर्णीलिखित पुस्तकाची आठवण होणं क्रमप्राप्त होतं. मराठी राज्याच्या विशेषतः व्यवस्थापकीय बाजू कशा चालत, त्यात कोणत्या संकल्पना-वस्तू-हुद्दे इत्यादींना कोणती नावं होती हे त्या पुस्तकात येतं. तत्कालीन शेती-उद्योग-अर्थव्यवहार-प्रशासन अशा अनेक बाबतींतली अतिशय रसाळ माहिती देणारं हे पुस्तक वाचताना एखाद्या भव्य पण द्विमित चित्राचं त्रिमित रूप अनुभवायला मिळाल्यासारखं वाटून हरखून जायला झालं होतं. त्या पुस्तकाला नेटकी संदर्भयादी आहे. तशी यादी कुळ्यांच्या पुस्तकाला नाही, ही उणीव जाणवली. पण तरी इतिहासाचे साक्षीदारची जातकुळी अचूक तीच आहे. खेरीज शिवकालीन महाराष्ट्रमध्ये अजिबात नसलेली, सुरस अशा लोककहाण्यांची आणि आख्यायिकांची बाजू कुळ्यांच्या पुस्तकाला आहे. संभाजीपुत्र शाहू महाराजांची उपस्त्री असलेल्या बिरूबाई त्यांनी लिंबशेरीला बांधवून घेतलेल्या बारवेच्या वरच्या बाजूला असलेल्या खास खोलीत महाराजांसह गप्पा करत बसत; किंवा आपल्या सावकारांनी बांधवलेल्या देखण्या घाटाचं श्रेय लाटायला मिळत नाही म्हटल्यावर दुसर्‍या बाजीरावानं तस्सा घाट बांधायला घेतला, सावकारांच्या घाटाचं पाणी तोडलं, नि वर आपला घाट पूर्ण न करताच पळ काढला; किंवा दानधर्म करणार्‍या आणि त्यासाठी पैसा वेचणार्‍या अहिल्याबाई होळकरांना घाटांची राणी म्हटलं जाई... अशा अनेक कहाण्या या गद्य तपशिलांमध्ये प्राण फुंकतात. हे अ. रा. कुलकर्णींच्या पुस्तकाबाबत घडत नाही. ते काहीसं रूक्षच राहतं. 


आता होळकरांच्या वाड्यात शाळा भरते, बंदुकी आणि तोफा आल्यावर जवळून लढाई खेळण्यासाठी वापरली जाणारी मराठेकालीन शस्त्रं अस्तंगत होत गेली, मुसलमानी राजवटीतल्या पोशाखाचा प्रभाव आजही भारतभर दिसतो, रास्त्यांंनी आपल्या वाड्यात जलक्रीडा करण्यासाठी खास हौद आणि कारंजी तर बांधून घेतला होताच, पण रंगबाजी रात्रीही बिनघोर चालावी म्हणून दिवे पाजळण्यासाठी त्यात खास कोनाडे होते, आज नाना फडणविसांचा पुण्यातला वाडा सरकारदरबारची धूळ खातो... असे, घटकेत समकालात, तर घटकेत इतिहासात नेणारे तपशील या 'इतिहासाचे साक्षीदार' या पुस्तकाची जान आहेत. 

साक्षीदारमधले घाट आणि बारवा यांबद्दलचे लेख वाचताना अनुपम मिश्रांच्या आज भी खरे है तालाबची (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) आठवण झाल्याखेरीज राहत नाही. या वास्तूंनी तहान भागवण्याचं जे काम केलं नि आजही करू शकतात, त्यावर त्या पुस्तकाचा रोख आहे. पण त्यातली रेखाटनं कुळ्यांच्या पुस्तकाला लाभली असती, तर आत्ता निव्वळ फोटोंवर जी तहान भागवावी लागते, त्या तपशीलवार देखणेपणाची हौस मनःपूत पुरवता आली असती असं वाटतं.

मराठेकालीन वस्त्रांचा इतिहास वाचताना आठवलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे कापूसकोंड्याची गोष्टहा, लक्ष्मण सत्या लिखित पुस्तकाचा नंदा खर्‍यांनी केलेला अनुवाद (मनोविकास प्रकाशन). भारतीय वस्त्रोद्योगाची दिगंतात पसरलेली कीर्ती ब्रिटिश राजवटीच्या काळात धुळीला मिळाली – किंबहुना मिळवली गेली. त्यामागे भारतीय पर्यावरण, पशुधन, शेती यांचं केलेलं अपरिमित शोषण आणि पद्धतशीर खच्चीकरण होतं. मराठेकालीन पैठण्यांची ख्याती वाचताना ते आठवल्याशिवाय कसं राहील?

सरतेशेवटी अशा प्रकारच्या पुस्तकांचा सरताज भासणारं पुस्तक - रूढार्थानं मराठ्यांच्या इतिहासाबद्दल नसलं, तरी इतिहासाच्या जडउर्फ लौकिकबाजूबद्दलचं अतीव रसाळ आणि दिलखेचक पुस्तक. म. वा. धोंडांचं ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ (मौज प्रकाशन). ते अर्थात आठवलं. ज्ञानेश्वरी म्हटल्यावर ओघानं येणार्‍या आध्यात्मिक चर्चा बाजूला सारून तत्कालीन चलन, सोन्याचा कस मोजण्याचे निकष, त्यात येणार्‍या वृक्षांच्या आज सापडणार्‍या वा हरवलेल्या खुणा, त्यातल्या शिव्याअशा अफलातून गोष्टींविषयी तपशीलवार, उत्कंठावर्धक, आणि रसाळ यात्रा करून यायची असेल, तर त्या पुस्तकाला पर्याय नाही.

इतिहासाचे साक्षीदारवाचताना अशी अनेकानेक पुस्तकं आठवली. आणखी एक दुखरा प्रश्नही पडला - शोधकर्त्या मुरलीधर खैरनारांच्या वाचनात इतिहासाचे साक्षीदारआलं होतं का असा तो प्रश्न. त्यांनी यांतल्या किती तपशिलांचा वापर करून काय-काय मौज केली असती आणि आपण त्यांच्या डोक्यातल्या किती जब्बर ऐतिहासिक शोधकादंबर्‍यांना मुकलो, कुणास ठाऊक.

इतिहासाचे साक्षीदार

मुकुंद कुळे

मनोविकास प्रकाशन

प्रथमावृत्ती २००६