'किष्किंधा कांडम्' हा दिजिंत अय्यतन दिग्दर्शित (नावाच्या उच्चारात चूक असल्यास ती माझ्या मराठी जिभेची) मल्याळम सिनेमा बघितला. फार आवडला.
- किती देखणा सिनेमा. जंगलाच्या काठावरचं, जर्रा दुर्लक्ष झालं तर जंगल हळूहळू मांंजरपावलांनी गिळून घेईल असं जुनं घर. आजूबाजूच्या हिरवेपणाचा अजस्र विस्तार. त्या किंचित उग्र, गूढ, दचका भरवणार्या, पण अफाट सुंदर दृश्यचौकटी गोष्टीला किती-किती मुक्यानं पूरक ठरणार्या. पार्श्वसंगीतही तसंच.
- कामं किती सूक्ष्म, संयत आणि बोलकी. जराही अतिरेक नाही. बोलके डोळे, नेमकी सहज देहबोली.
- रहस्याचा उलगडा झाल्यानंतर मग पुन्हा पहिल्यापासून शेवटापर्यंतचा सिनेमा डोक्यात झरझर उलगडला जातो आणि पटकथेचं फार कौतुक वाटतं. एखाद्दोन किंचित खटकणार्या बाबी आहेत, नाहीतसं नाही. पण बाकी सिनेमा इतका सुरेख असल्यामुळे त्या जाणवतात हे एक. नि त्याबद्दल बोलायचं तर गोष्ट उलगडावी लागेल हे दुसरं. त्यामुळे त्याबद्दल मौन.
- गोष्ट सोडून उगाच भलभलत्या गोष्टी करण्यात सिनेमाला अजिबात रस नाही. उगाच मोठाले आवाज करून घाबरवणं नाही, प्रेक्षकाला भलतीकडेच नेऊन सोडण्याकरता काहीतरी संशयास्पद सुटे धागे घुसडलेले नाहीत, जाता-जाता उगाच सामाजिक बोधामृत पाजणं नाही. एक नेटकी, निरी गोष्ट. बस.
- बाप-लेकामधलंं नातं, बायको-नवर्यातलं नातं, मित्रामित्रामधलं नातं, भावाभावातलं नातं - इतकंच काय, स्थानिक गावकरी, जंगलखात्याचे कर्मचारी, पोलीस खातं, सैन्यदलातले लोक... या सगळ्यांची स्वभाववैशिष्ट्यं, सूक्ष्म राजकारणं, आणि एकमेकांविषयी विशिष्ट सावध पवित्रे घेत, पण माणुसकी असलेलं वागणं... हे किती अदबशीरपणे आलं आहे सिनेमात. भावबंबाळ नसलेल्या, डोळ्यात मुद्दाम बोट न खुपसणार्या बारीक तपशिलांनिशी.
- काही वर्षांपूर्वी आलेल्या अजय फणसेकर दिग्दर्शित 'रात्र आरंभ'ची आठवण होण्याला पर्याय नव्हता. तो कमी देखणा होता. पण याच जातीचा. वेगळा, नेटका, बंदिस्त, आणि विचारात टाकणारा.


