Tuesday, 17 September 2024

किष्किंधा कांडम्

'किष्किंधा कांडम्' हा दिजिंत अय्यतन दिग्दर्शित (नावाच्या उच्चारात चूक असल्यास ती माझ्या मराठी जिभेची) मल्याळम सिनेमा बघितला. फार आवडला.


- किती देखणा सिनेमा. जंगलाच्या काठावरचं, जर्रा दुर्लक्ष झालं तर जंगल हळूहळू मांंजरपावलांनी गिळून घेईल असं जुनं घर. आजूबाजूच्या हिरवेपणाचा अजस्र विस्तार. त्या किंचित उग्र, गूढ, दचका भरवणार्या, पण अफाट सुंदर दृश्यचौकटी गोष्टीला किती-किती मुक्यानं पूरक ठरणार्या. पार्श्वसंगीतही तसंच.

- कामं किती सूक्ष्म, संयत आणि बोलकी. जराही अतिरेक नाही. बोलके डोळे, नेमकी सहज देहबोली.

- रहस्याचा उलगडा झाल्यानंतर मग पुन्हा पहिल्यापासून शेवटापर्यंतचा सिनेमा डोक्यात झरझर उलगडला जातो आणि पटकथेचं फार कौतुक वाटतं. एखाद्दोन किंचित खटकणार्या बाबी आहेत, नाहीतसं नाही. पण बाकी सिनेमा इतका सुरेख असल्यामुळे त्या जाणवतात हे एक. नि त्याबद्दल बोलायचं तर गोष्ट उलगडावी लागेल हे दुसरं. त्यामुळे त्याबद्दल मौन.

- गोष्ट सोडून उगाच भलभलत्या गोष्टी करण्यात सिनेमाला अजिबात रस नाही. उगाच मोठाले आवाज करून घाबरवणं नाही, प्रेक्षकाला भलतीकडेच नेऊन सोडण्याकरता काहीतरी संशयास्पद सुटे धागे घुसडलेले नाहीत, जाता-जाता उगाच सामाजिक बोधामृत पाजणं नाही. एक नेटकी, निरी गोष्ट. बस.

- बाप-लेकामधलंं नातं, बायको-नवर्यातलं नातं, मित्रामित्रामधलं नातं, भावाभावातलं नातं - इतकंच काय, स्थानिक गावकरी, जंगलखात्याचे कर्मचारी, पोलीस खातं, सैन्यदलातले लोक... या सगळ्यांची स्वभाववैशिष्ट्यं, सूक्ष्म राजकारणं, आणि एकमेकांविषयी विशिष्ट सावध पवित्रे घेत, पण माणुसकी असलेलं वागणं... हे किती अदबशीरपणे आलं आहे सिनेमात. भावबंबाळ नसलेल्या, डोळ्यात मुद्दाम बोट न खुपसणार्या बारीक तपशिलांनिशी.

- काही वर्षांपूर्वी आलेल्या अजय फणसेकर दिग्दर्शित 'रात्र आरंभ'ची आठवण होण्याला पर्याय नव्हता. तो कमी देखणा होता. पण याच जातीचा. वेगळा, नेटका, बंदिस्त, आणि विचारात टाकणारा.

एक जुनी मुलाखत : लागू आणि तेंडुलकर व्हाया वागळे

येता-जाता, चालता चालता जुन्या मुलाखती ऐकत होते. तेंडुलकर आणि लागूंची वागळेंनी २००७ साली घेतलेली एक मुलाखत ऐकली.


तेंडुलकर आणि लागू - हे दोघंही अतिशय, अतिशय निराश वाटतात. पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल हे दोन अतिशहाणे म्हातारे मराठी लोकांना घाबरवताहेत की काय उगाच, असंही तेव्हा वाटलं असतं, अशा प्रकारचं, जरा ढोबळ बोलतात. पण मधल्या जेमतेम १७ वर्षांत त्यांच्या भीतीच्या किती पुढे येऊन ठेपलो आपण! त्यांनी व्यक्त केलेल्या पर्यावरणीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक.... अशा सगळ्या सगळ्या शंका सत्यात उतरल्या आहेत, आपण त्या पचवल्या आहेत, आणि तरी आपण बेगुमानपणे, मिळेल तो आनंदाचा किडूकमिडूक तुकडा ओरबाडून भोगत, लाथा मारत-लाथा खात जगतोच आहोत, धावतोच आहोत.... आताच्या आपल्याला बघून काय म्हणले असते हे दोन लोक - असं वाटतं.
लागू आणि तेंडुलकर यांच्यात जुगलबंदी घडवून आणण्याचा वागळेंचा क्षीण प्रयत्न बघून आणि वागळेंना नेमकी नि तिखट उत्तरं देऊन गप्प करणारे तेंडुलकर बघून खूप गंमत वाटते. पण त्याचबरोबरीनं - "माझ्यासारखा माणूस काय करू शकतो म्हणजे? नोकरी सोडू शकतो. मी सोडल्या आहेत. जेव्हा परिस्थिती सगळ्या बाजूंनी वाटा बंद करते, तेव्हाही वाट निघतेच. निघेलच." असं कमाल वास्तववादी, निर्भीड, बाणेदार उत्तर देणारे तेंडुलकर बघून स्वतःचं यूट्यूब चॅनल काढणारा रवीश, त्याच्यासारखे अनेक पत्रकार आणि २४च्या निवडणुकीवर त्यांनी घडवून आणलेला परिणाम आठवतो. तेंडुलकरांच्या दीर्घदृष्टीचं अजब-अजब वाटतं.
"आमची पिढी गाफील राहिली. स्वातंत्र्य आलं म्हणजे सगळे प्रश्न संपले असं मानून आम्ही आमच्या विषयापुरते उरलो." असं म्हणणारे लागू बघून स्वतःबद्दल सावध व्हायला होतं. भाजपचं सरकार गेलं की सगळे प्रश्न संपणार नाहीयेत, भाजपला सरकारात बसवणारे लोक आपणच होतो आणि आपण जर बदललो नाही, तर आपण ते तसेच्या तसेच पुढेही असणार आहोत, अशी चरकायला लावणारी जाणीव होते.
हे दोन लोक जाहीरपणे बोलणार म्हणून बघायला-ऐकायला समोर जमलेला प्रेक्षकसमुदाय, तुडुंब भरलेलं सभागृह, त्यांचा जिवंत प्रतिसाद बघूनही जरा थबकायला होतं. स्वतःला कलाकार म्हणवणारे आणि सामाजिक-राजकीय बाबींविषयी गंभीरपणे विचार मांडू शकणारे असे कोण लोक आज अशी गर्दी जमवू शकतील? विचार करकरूनही उत्तर सुचत नाही. भ्यायला होतं. आणि तरी तेंडुलकरांच्या बोलण्यातलं बाकी सगळं सोडून त्यांच्या नियतीप्रेमाबद्दलच टाळ्या पिटणारे लोकही दिसायचे राहत नाहीत. वाटतं, साला, आपण लोकच असे दळभद्री की काय? समोर लागू आणि तेंडुलकर काहीतरी म्हणताहेत, आणि आपल्याला त्यांच्या बोलण्यातले हे नियतीबियतीसारखे सैल-विशविशीत धागे तेवढे उराशी धरावेतसे वाटावेत?
जुन्या मुलाखती ऐकणं इतकं विचारात पाडणारं असेल, याची मला कल्पना नव्हती. त्याही बाबतीत या दोन माणसांनी धक्का दिला.

Thursday, 4 July 2024

गणेश कनाटे यांचा 'मनसमझावन'बद्दलचा लेख

‘मुक्त शब्द’च्या जून २०२४च्या अंकातला गणेश कनाटे यांचा लेख वाचला.

‘मनसमझावन’ या संग्राम गायकवाड यांच्या कादंबरीविषयीचा तो लेख आहे. शीर्षकात स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे तो कादंबरीविषयीचा लेख आहे, तसा त्या निमित्ताने इतर निरीक्षणे मांडणाराही लेख आहे.

‘फेसबुक’ किंवा ब्लॉगवर पुस्तकाचा वा सिनेमाचा परिचय म्हणा, वा त्याबद्दलचं शेरेवजा मत म्हणा, लिहिताना आपण काय करत नाही आहोत याचं भान कायम असतं. या लेखानं ते अजूनच धारदार केलं.

लेखाच्या सुरुवातीलाच लेखकानं आपल्या लेखाच्या मर्यादाही नेमक्या आखून मांडलेल्या आहेत.

आशय वा आशयाबद्दलची लेखकाची मनीषा, आशय सखोलपणे आणि परिणामकारकपणे व्यक्त व्हावा यासाठी वापरण्याची लेखनतंत्रं आणि त्यांतला सफाईदारपणा वा त्याचा अभाव, लेखनापूर्वीचं संशोधन आणि त्याचा बरावाईट वापर, निवेदनपद्धती... यांविषयी सडेतोड आणि सोदाहरण असमाधान व्यक्त करणार्या या लेखामध्ये लेखकाविषयी अतिशय सहृदय अशी आस्था आहे. लेखकानं केलेल्या आणि त्याला जमलेल्या चांगल्या गोष्टींविषयी कौतुक आहे आणि मग मर्यादांची चिकित्सा आहे. इतक्या त्रुटी असूनही लेखकाच्या साहित्यकृतीची चर्चा होत असेल, तर त्यात एकंदरीत साहित्यविश्वातली परिस्थिती कशी कारणीभूत आहे, याचं नेमकं भान आहे. ‘याला लोकांनी जामच डोक्यावर घेतलाय, आता याला याची जागाच दाखवून देतो की नाही बघा’ किंवा ‘बघा याच्या कशा चिंध्या-चिंध्या करतो’ असा अभिनिवेश नाही.

असा अभिनिवेश मध्यंतरी ‘मुक्त शब्द’मध्येच आलेल्या उदय रोटे यांच्या, निखिलेश चित्रेंच्या ‘गॉगल लावलेला घोडा’विषयीच्या लेखात दिसला होता. अतिशय वाईट वाटलं होतं. सर्वसामान्य वाचकाला थोड्या श्रमानिशी समजू शकेल (accessible to layman reader) अशी चिकित्सा - आणि टीकाही - व्हायला हवीच, पण त्या चिकित्सेला लेखकाविषयीच्या आस्थेची जोड असणं किती आवश्यक आहे – एरवी ती चिकित्सा कशी अस्पृश्य ठरते, ते जाणवून खंतावायला झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर या लेखाबद्दल कृतज्ञ वाटलं.

लेखकाचा एक परिच्छेद उद्धृत केल्याशिवाय पुढे जाववत नाही –

...ब्लर्ब, परिचय, परीक्षणे, प्रस्तावना आणि समीक्षा लिहिणार्या सर्वच मान्यवरांना एक नम्र अशी विनंती या निमित्ताने करावीशी वाटते, की कृपा करून अतिशयोक्त प्रशंसा करण्याच्या आणि केवळ चांगले चांगले लिहिण्याच्या या पद्धतीस थोडातरी आळा घाला. एखाद्या साहित्यकृतीवर दहा ओळी लिहिणार असाल तर आठ ओळी त्या साहित्यकृतीच्या बलस्थानांबद्दल किंवा चांगल्या गोष्टींबद्दल लिहा पण दोन ओळीतरी त्या साहित्यकृतीतील तुम्हांला जाणवणार्या मर्यादांबद्दल लिहा. की तुम्हांला साहित्यकृती वाचताना मर्यादा दिसतच नाही? की त्या बघायच्यात नाहीत? की त्या दिसतात, लक्षातही येतात; परंतु त्याबद्दल लिहायचे नाही, असे काही आपण ठरवले आहे का?...

Sunday, 2 June 2024

वस्त्रहरण, लापता लेडीज, बेबी, द लायन किंग, आणि तात्पर्य

फेसबुकाची सवय लागली आणि ब्लॉग बॅक-अपपुरता उरला. धार्मिक-राजकीय उन्मादकाळात फेसबुकवरच्या गर्दीनंही घाम फुटू लागला आणि तिथून फारकत घेतली. मग निवडणुका आणि व्याकूळता आणि अस्वस्थता या सगळ्याला व्हॉट्सॅपची किनार होती, आहे. तिथून अधिक आश्वस्त करणारी सोबत मिळवता आली, काही प्रमाणात पुरवताही आली. पण आता निकाल काहीही लागला, तरी तिथलं मायक्रोलेखनही हळूहळू आटत जाईल.

तंत्रज्ञान, माध्यमं, आणि वस्तू मिळून आपल्या मेंदूतल्या जोडण्या बदलत असतात हे आता आपल्याला नवीन नाही. त्यावर उत्तर काय, हे मात्र अजुनी तितकंसं धडपणी कळलेलं नाही. मधल्या काळात बघणं, वाचणं झालं. पण आला मनात विचार, टिचव दोन पैसे,’ हे झालं नाही. आपण नाहीच काही म्हणलो, तर असा काय फरक पडणार आहे, असा एक काहीसा उदासीन विचार होता. पण हे ठरवून घडवलं असं म्हणणं म्हणजे स्वतःला फसवणं होईल. काही प्रमाणात मनःस्वास्थ्य टिकवण्याचा भाग होता, काही प्रमाणात आळस होता. काही प्रमाणात माध्यमांपासून दूर राहून बघणं होतं. फायदा झाला, नाही असं नाही. पण सगळ्याची गोळाबेरीज म्हणून जे काही थोडंफार नोंदी ठेवणं होतं, ते संपून गेलं.

या टप्प्यावर आपल्या लिहिण्या-वाचण्यात, बोलण्यात-ऐकण्यात, एकूणच वावरण्यात आणि जगण्यात आलेली अस्वस्थता, अधीरता, व्याकूळता, एकटेपणा, धास्तावलेपणा फारच प्रकर्षानं जाणवतो आहे. डाचतो आहे. अशा वेळी सवयीच्या माध्यमाच्या काडीचा आधार न वाटला, तरच नवल. म्हणून ब्लॉग.

काय वाचणं, काय बघणं चालू आहे, त्याच्या नोंदी ठेवणे इतकाच या बॅक टु ब्लॉग प्रकल्पाचा अर्थ. व्यक्त झालेली मतं चिमूटभर मिठासहितच घ्यायची.

‍~

वस्त्रहरण


या गंगाराम गवाणकर लिखित नाटकाला ४४ वर्षं झाली. मच्छिंद्र कांबळींनी गाजवलेलं हे नाटक मी पाहिलं नव्हतं. म्हणून उत्सुकता होती. त्याखेरीज, ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेल्या प्रयोगातल्या सिगारेट फुंकणार्‍या सीतेच्या पात्रानं झालेला गदारोळ डोक्यात ताजा होता. वस्त्रहरणहे कोकणातल्या दशावतारी मंडळींनी केलेल्या नाट्यप्रयोगाबद्दलचं नाटक. त्यात काय-काय धमाल घडत असेल नि स्कॅंडलाइज न होता प्रेक्षक ही धमाल कशी अनुभवत असतील, याची कल्पनाही नीटशी करता येत नव्हती. संतोष पवारांचं महाभारतावर आधारित असलेलं यदाकदाचितअगदी ताजं असताना आणि नंतरही एकदोनदा पाहिलं होतं, आवडलं होतं. पण सध्याच्या राजकीय उन्मादकाळात तेही रंगमंचावर होणं कठीण आहे. अशा वेळी 'यदाकदाचित'चा हा मूळपुरुष कसा दिसतो, वावरतोत्याबद्दल अपार कुतूहल होतं.

प्रयोग अनुभवला. खूप धमाल आली. नाटक मला किंचित लांबलेलं वाटलं, पण ते अपेक्षितच होतं. आपल्याला आता पुष्कळच जास्त वेगाची सवय झालेली आहे. हे अर्धशतक जुनं नाटक किंचित संथ वाटणारच. पण मजा म्हणजे स्वतःच्या या घायकुतेपणाची जाणीव व्हावी, इतका धमाल प्रतिसाद प्रेक्षागृहातून होता. प्रयोग हाउसफुल्ल होता. लोक मनमुराद खिदळत होते. दारू पिऊन तर्राट असलेला अर्जुनाचा पार्टी, यच्चयावत पात्रांनी सूत्रधाराच्या धोतराला हात घालणं, सूत्रधाराच्या गोप्या नामक हरकाम्याचा मुक्त वावर, भलत्या जागी गदा लागल्यावर फेंगडत जाणारा दुर्योधन, बाईचा नाच बघण्याची इच्छा फेडून घेणारा देवाच्या अंगात आलेला देव, बाई स्टेजवर आली म्हणताना पाघळलेले तालीममास्तरांपासून ते सूत्रधारापर्यंत एकजात सगळे कोकणी बाप्ये, परक्या बाईच्या अंगाला हात लावू न देणारी दुःशासनाच्या पार्ट्याची बाईलहे सगळे ट्रोप्स आणि त्यातले अश्लील होता-होता थबकलेले पण अजिबात न लाजता लिहिलेले निःसंशय चावट संवाद. दमदार संगीत. सगळ्यांवर कडी म्हणजे मालवणी बोलीचा सहज गोडवा. मजा का येऊ नये!

अगदी लहानलहान भूमिकांमध्येही कसलेले जबरदस्त नट असले की त्यानं नाटकाच्या अनुभवात किती नि कशी भर पडते, ते परत एकदा अनुभवलं. नटसंच बघताना मला उगाचच किंचित अभिमान वाटला. एरवी आपली नजर कायम आपल्या रम्य भूतकाळात रुतलेली असते, पण या नटसंचात जुने-जाणते असे जबरे नट होते, तितकेच नव्या दमाचे आणि लोकांना बांधून ठेवणारे खणखणीत नटही होते. असे नट काही प्रयोगांकरता का होईना, एकत्र येऊन हे चाळीसेक वर्षं जुनं नाटक करतात आणि लोक ते बघायला येतात, हे अनुभवताना मला जाम भारी वाटलं. असंही वाटलं, की सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात फुसक्या गोष्टींचं भांडवल करून भावना दुखावल्या म्हणून बोंब ठोकणार्‍या राजकीय झुंडींमधली हवा काढून घ्यायची असेल, तर प्रेक्षक जाणता आणि जागता हवा. देवादिकांची निर्मळ चेष्टा करून पोट धरून हसणार्‍या–हसवणार्‍या नाटकांची आपली परंपरा जिवंत ठेवणे हाच त्यासाठीचा राजरस्ता असू शकतो, की नाही?

वस्त्रहरणजिवंत ठेवणार्‍या सगळ्यांबद्दल जाम कृतज्ञता वाटली. 

~

लापता लेडीज


थेटरात दोनदा आणि नेटफ्लिक्सवर एकदोनदा पाहिला. निलाजरेपणी पैसे खाणारा नि गाणार्‍या बाईकडून ठुमरी ऐकून त्याबद्दल्यात लाचेचे थोडे पैसे कमी करणारा पोलीस इन्स्पेक्टर हे या वर्षातल्या हिंदी सिनेमांमधलं सगळ्यांत धमाल पात्र असेल बहुधा. या भाबड्या, गोड, काहीशा स्वप्नील पण तिरकस सिनेमातल्या ताज्या दमाच्या नटनट्या बघताना डोळ्यांत आनंदानं पाणी आलं. राम संपतची गाणी कॅसेटकाळातल्यासारखी पिसून पिसून ऐकली. मजा आली.

~

बेबी


मी तेंडुलकरांचं बेबीवाचलं नव्हतं. नुसतीच त्याबद्दलची लोकांची वक्तव्यं ऐकून आ वासला होता कायम. सत्यदेव दुबेंना म्हणे ते शतकातलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटलं होतं

मुकुंद टाकसाळेंमुळे बेबी वाचायला मिळालं. आवडलं मला, नाही असं नाही. पण अगदी खरं सांगायचं तर इतका का बुवा याचा बडेजाव?’ असं वाटलं. 

एका गुंडानं सर्वथैव शोषण केलेल्या एका बहीणभावंडांची ती गोष्ट, असं त्याचं एका ओळीत वर्णन करता येईल. अर्थात नाटक त्याहून पुष्कळ काही आहे. त्याबद्दल लिहिलं जाईल तितकं थोडं आहे. पण सत्तरीच्या दशकात त्यातल्या लैंगिक शोषणाची जातकुळी प्रेक्षकाला जितकी धक्कादायक वाटली असेल, तितकी आज मला अजिबातच वाटली नाही. लैंगिकतेचे निरनिराळे रोगीट आणि निरोगी आविष्कार, त्यामागचे गुंते, त्यातल्या शोषणाच्या नाना परी... आजच्या प्रेक्षकाला पुष्कळ खुलेपणानं ठाऊक आहेत. त्यामुळे त्याचा धक्का नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे शिवाप्पाचं पात्र. कुठलाही चांगला नट त्या पात्राचीही बॅकस्टोरी खणून काढेल, हे जरी खरं असलं, तरी मुळात त्या पात्राचे खलत्वाचे रंग फार फार गडद-एकेरी आहेत असं वाटलं. त्यामुळे माझा थोडा रसभंग झाला. बाकी बेबीच्या निरागसतेबद्दल, स्वस्त साहित्यातून तिला मिळत असलेल्या बळाबद्दल, राघवच्या पात्रामधल्या शोषणकर्त्याबद्दल नि शोषिताबद्दल खूप काही खूप जणांनी पूर्वीच म्हटलेलं असणार. 

पण Has it aged well? Well… चटकन तोंड भरून होकार देववेना मला.

~

द लायन किंग


द लायन किंगचा ट्रोपच काय, गोष्टही चिरपरिचित. जुनीही. तरी नाटक बघायला अशक्य मजा आली. एकाच नाट्यगृहात पंचवीसेक वर्षं चाललेलं आणि आजही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खेचणारं नाटक. 

किती साधीसाधी तंत्रं! बांबूच्या घोड्यांचा वापर करून जिवंत केलेले जिराफ. एका विशिष्ट कोनात डोक्यावर पेहरलेले मुखवटे आणि मानेच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली करून चतुष्पाद प्राण्यांच्या हालचालींचा आणवलेला आभास. हरणांच्या बाह्याकृतीचे सांगाडे आणि त्यांना चाकं लावून करवलेल्या त्यांच्या पायांच्या धावत्या हालचाली, ते हाती धरून नाचर्‍या पायांनी पळणारे समूह आणि त्यातून जिवंत केलेले हरणांचे कळप. उंच काठ्यांना भिरभिर्‍यासारख्या फिरत्या चक्र्या लावून जिवंत केलेले पक्षी. कापडाच्या प्रचंड मोठ्या फिरत्या रिळांमधून वरखाली केल्या जाणार्‍या शिंगांच्या आकृत्या आणि त्यातून जिवंत केलेला रानगव्यांच्या पाठलागाचा प्रसंग. सांगावं तितकं कमी! 

तीन मजली प्रेक्षागृह, त्याला दोन पाखांनी असलेल्या वाद्यवृंदाच्या गॅलर्‍या, आणि खुद्द मंच... हा सगळाच्या सगळा – उंचीसकटचा – अवकाश वापरून जिवंत केलेला जंगलाचा आभास.  कुठे डोलकाठ्यांसारख्या उंच काठ्यांवरून भिरभिरणारे पक्षी, कुठे प्रेक्षागृहातून धावत अवतरणारे प्राणी, कुठे वाद्यमेळाच्या जागांतून डोकावणारे प्राणी... या सगळ्यातली कल्पकता अचंबित करून गेली. 

संगीत आणि भाषाही थोडी बिनसरावाची असली, गोष्ट जुनीच असली, तरी नेपथ्य-रंगभूषा-वेशभूषेच्या या जादूनं तीन तास मंत्रमुग्ध करून ठेवलं. कर्टन कॉल अनुभवताना टाळ्या पिटणारे हात आणि ताल धरणारे पाय थांबता थांबेनात. पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या चेहर्‍यावर एकच हरखलेलं हसू. साहेबाच्या देशाच्या या श्रीमंतीचं अप्रूप-अप्रूप वाटलं.

‍~

तात्पर्य


अवधूत डोंगरेनं साधनेत मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी. एरवी मुलांसाठी गोष्ट लिहिताना जे नाट्यपूर्ण घटक सहसा अनिवार्य मानले जातात, ते या गोष्टींमधून गायब आहेत. साध्यासाध्या, दैनंदिन गोष्टींबद्दलची निरीक्षणं, मनात उमटणार्‍या भावना, त्यामागचा कार्यकारणभाव जमेल तसा समजून घेणं, रोजच्या आयुष्यातलं विलक्षण काही टिपून घेणं... अशा लहान जीवाच्या कथा. वाचताना एकेकदा गळ्याशी आवंढा आणणार्‍या. जिवंत. अशा अजून कथा वाचायची तहान लागली. पण अवधूत डोंगरे हे वाचकाग्रहास्तव काही लिहिणार्‍यांपैकी थोडेच आहेत?!

तात्पर्य : दिसामाजी काहीतरी... :) 

Thursday, 4 April 2024

रिव्हर्स ऑफ लंडन

हा ब्लॉग सुरू केला, तेव्हा निव्वळ पुस्तकांचे परिचय द्यावेत, असं डोक्यात नव्हतं. 

लहानपणापासून एखाद्या पुस्तकी किड्याप्रमाणे वाचन केलं जात असे. त्याबद्दल काही स्वतंत्र विचार करणंही होऊ नये, इतकी ती कृती अंगवळणी पडली. पुस्तक सोबत असल्याचा अजब दिलासा वाटत असे. अजूनही वाटतो. पण स्मार्ट फोन, इंटरनेट, फेसबुक-वत्साप या गोष्टींमुळे वाचनाची सवय बदलत गेली. अगदी खोलात जाऊन पाहायचं, तर नजरेनं पुस्तकाचा मजकूर बकाबका खाल्ला जातो. अधले मधले शब्द सुटून जातात. साधारण आशय कळवून नजर पुढे धावत सुटते. त्यातही अधूनमधून नॉटिफिकेशन्स येतात. लक्ष अनेकदा बाहेर जातं. फेसबुकसारख्या चावडीसदृश माध्यमांमुळे लोकांशी संवादण्याची - खरं तर सतत ठिणग्या उडवत राहण्याची - वाईट खोड लागली आहे. पुस्तकं पूर्वीसारखी दुर्मीळ उरलेली नाहीत. म्हणाल ते पुस्तक म्हणाल तेव्हा हाताशी येतं. बऱ्यावाईट मार्गांनी मिळतंच मिळतं. त्यामुळे पुस्तकं अधाशीपणे बुडाखाली गोळा करून ठेवायची अजून एक वाईट सवय लागली आहे. नुसताच साठा. वाचायला वेळ नाही. 


कुठल्या सवयी बदलल्या तर ही बदलेल, याचं निरीक्षण नकळत होत राहतं. त्याबद्दलच्या नोंदी या ब्लॉगवर करायच्या होत्या. पण इतक्या शिस्तीनं हातून काही होत असतं, तर काय हवं होतं! 


या मूळ हेतूची नोंद करून ठेवते. त्याचबरोबर फेसबुक बंद करून ठेवल्यामुळे वाचनात फरक पडतो याचीही नोंद. 


डिसेंबरात शेवटी कधीतरी काम होत नसल्यानं वैतागून ते बंद केलं. आज त्याला तीन महिन्यांहून जास्त दिवस झाले. मधल्या काळात ‘रिव्हर्स ऑफ लंडन’ ही बेन आरोनोविचची मालिका (Rivers of London : Ben Aaronovitch) पुन्हा नव्यानं हाती घेतली. 



लंडनचं पोलीस खातं अद्भुताच्या प्रांतातल्या गुन्ह्यांची उकल करत असेल, तेही गुपचुप, आणि त्या खात्यात नव्यानंच शिरलेला नायक आजच्या जगातली तिरकस, आधुनिक, कॅज्युअल भाषा वापरून त्या सगळ्याचं वर्णन करत असेल, काय होईल कल्पना करा. त्यात लंडनच्या इतिहासाचं अतिशय नेटकं भान मिसळून द्या. नद्यांची व्यक्तिमत्त्वं डोळ्यासमोर आणा. 


काही वर्षांपूर्वीही मालिका आवडलीच होती. पण मधल्या धबडग्यात सुटूनही गेली हातून. या वेळी जास्त सावकाश, चवीनं वाचली. त्या नायकाच्या काळ्या वंशामुळे त्यांच्या नजरेला आलेली तिरकस आणि सूक्ष्म धार थबकून अनुभवली. त्यांची ब्रिटिश विनोदबुद्धी अनुभवताना मनापासून हसले.    


मालिकेबद्दल स्वतंत्र आणि ऐसपैस लिहीन. तूर्त ही फक्त नोंद. खूप दिवसांनी ब्लॉगकडे परतून यावं वाटलं. वाचन पुन्हा आपलंसं करता येतं, या प्रत्ययानं हायसं वाटलं. मधल्या काळात आवडीनिवडींमध्ये, वाचनाच्या वेगात आणि पद्धतीत बदल झालेले स्पष्ट अनुभवले. 


या निमित्तानं केलेली ही नोंद. बोलत राहू. 


Monday, 11 December 2023

द प्यूमा इयर्स

अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यातला एक विकसनशील देश. तिथलं भ्रष्ट सरकार. गरीब, नाडलेले, शोषित लोक. अस्ताव्यस्त, निबीड, गर्द, स्तिमित करणारं जंगल आणि त्यातले प्राणी. लाकूड आणि खनिजं यांसाठी त्या जंगलावर डोळा ठेवून असलेल्या बड्या कंपन्या. विकासाच्या नावाखाली वाढते रस्ते. विरळ होत जाणारं, लचके तोडले जाणारं, नैसर्गिक आणि कृत्रिम वणव्यांखाली भाजून काढलं जाणारं... अपरिहार्यपणे आटत-आक्रसत जाणारं जंगल. हक्काचा अधिवास गमावणारे, परागंदा होणारे, कधी कुणा श्रीमंती फॅडपायी शिकार होऊन कातडी वा दातरूपानं उरणारे, कधी सर्कशीत विकले जाणारे, कधी कुणा अतिश्रीमंत विकृत चाळ्यांपायी पाळीवकेले जाणारे, अक्षरशः मुक्यानं सोसणारे प्राणी.

या प्राण्यांच्या अपेष्टा सहन न होऊन कुणीतरी कधीतरी आंदोलन उभं केलं. प्राण्यांच्या अंदाधुंद छळावर नियंत्रण आणलं. पण त्यांना ठेवायचं कुठे? लहानपणी नैसर्गिक अधिवासात न वाढलेले आणि आता मोकळे केलेले वन्य पशू कुठे कसे जगतील, तगतील? तगतील का? त्यांच्यासाठी कुणीतरी पदरचा पैसा खर्चून जमीन खरीदली. तिथे अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालय यांच्या मधली एक व्यवस्था कशीबशी उभी केली. त्यांना खायलाप्यायला मिळावं, त्यांना माफक का होईना – जंगलात वावरता यावं, आपणच त्यांच्यावर लादलेल्या छळाचं थोडं परिमार्जन करता यावं अशी ती यंत्रणा. अपुरा निधी, जगभरातून – विशेषतः विकसित देशांतून – कुतूहलानं येणारं स्वयंसेवक, आणि काही माणसांचं या प्राण्यांवरचं प्रेम – इतक्या बळावर चालत राहिलेली. रंगीत काकाकुवे आणि पोपट, शहामृगं, निरनिराळ्या जातींची माकडं, रानडुकरं, आणि मांजरं. पण घराच्या उबेला राहणारी नव्हेत हो. मोठाली मांजरं. बिबट्ये, जॅग्वार आणि प्युमा. कुणी छळापोटी चिडखोर बनलेलं. कुणी निराशेनं ग्रासलेलं. कुणी आत्महत्याप्रवण. कुणी अपंग. कुणी पंख छाटलेलं... त्यांना सर्वतोपरी जगवणारी माणसं. बाहेरच्या जगाशी जुळवून न घेता येणारी.

अशा एका पार्कात कुणी एक लॉरा कोलमन जाऊन पोचली. दुनियेची यशापयशाची चाकोरीबद्ध समीकरणं काही केल्या न समजणं, ‘माझंच बरोबर-जग गेलं खड्ड्यात अशा निबर-कोडग्या आत्मविश्वासाचा अभाव, मनातली व्याकूळता... अशा सगळ्यात भेलकांडत राहिलेली जेमतेम विशीतली, अस्वस्थ, असुरक्षित, अस्थिर मुलगी.

तिला त्या पार्कमधल्या वायरानामक प्यूमाबरोबर फिरण्याचं काम मिळालं. जेमतेम महिन्याभरापुरती पार्कात आलेली लॉरा सुरुवातीला धसकली, श्रमली, भ्यायली, रडली. पण कसा कोण जाणे, तिथे तिचा पाय टिकला. तिचं काहीतरी जुळलं. जंगलाशी. तिथल्या अनागर, उग्र रंगांशी, गंधांशी, नादांशी. तिथल्या प्राण्यांच्या अश्राप प्रेमाशी, भित्यांशी, असुरक्षिततांशी.

तिच्या तिथल्या सहकारिणीच्या शब्दांत सांगायचं, तर त्या प्राण्या-माणसांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःभोवती उभा केलेला एकेक थर त्या जंगलानं जणू हळूहळू सोलत नेला. आतलं अनाघ्रात कोवळेपण हळूहळू उजळत गेलं.

त्या प्रक्रियेची ही गोष्ट.

वाचताना काय वाटलं काय सांगू! वायरानं टाकलेलं एकेक बिचकतं पाऊल, तिच्या नजरेतली भीती आणि उग्र दहशत, तिच्या उरातली गुरगुर, तिनं लॉरावर केलेला हल्ला आणि मग तिच्या उरावर घुसळलेलं मस्तक... हा सगळा प्रवास अवाक होऊन पाहिला.

परिसंस्थेचं अक्षरशः सम्राटपण अनुभवणारे हे प्राणी. विस्तीर्ण अधिवासात मोजक्याच संख्येनं नांदणार्‍या राजासारखे. देहबोलीतली लय, तंदुरुस्ती, देखणेपण, डौल, दिमाख... या सगळ्यांनी परिपूर्ण असलेले. त्यांचं आपण हे काय करतो आहोत, या प्रश्नाचं उत्तर देता देववलं नाही, देववत नाही. दोषी तर आपण सगळेच जण आहोत. संडासाकरता अनेकानेक बादल्या फ्लश करणारे, विमानानं इकडून तिकडे सहजी उडणारे, कुठल्याही ऋतूत कुठल्याही प्रदेशातलं अन्न खाण्याची मिजास करणारे, अजून-अजून-अजून अशी भूक न संपणारे. आपली भूक कुठवर जाणार आहे? कशाकशाचा बळी घेऊन संपणार आहे?

ही विशीतली मुलं अशा प्रश्नांना न भिता प्राण्यांवर वेडं प्रेम करत राहतात. थकतात. विझतात. माघार घेतात. पुन्हा नव्यानं भिडतात. त्यांच्याबद्दल वाचताना नतमस्तक आणि हताश असं दोन्ही वाटलं. पण सरतेशेवटी तेही मनाशी उरलं नाही. लक्ष्यात राहिलं, ते लॉरा आणि वायरा यांचं एकमेकींवर विश्वासून, आनंदून, थरारून जंगल अनुभवणं.

द प्युमा इयर्स

लॉरा कोलमन

प्रथमावृत्ती २०२१

लिटिल ए प्रकाशन

('अनुभव', फेब्रुवारी २०२४ या अंकात प्रकाशित झालेला विस्तृत लेख इथे आहे.)


Wednesday, 18 October 2023

डोह

उन्हातून कातून तुकडा काढावा तसे भासणारे पांढरेशुभ्र गोड दूध, अंगात खूप ताकद भरवणारा रानाचा हिरवा वास, हिरव्याकाळ्या गूढ-जिवंत सावल्या, मऊ पण घट्ट असे देवीचे काळेशार दगडी अंग, पोर मेल्याच्या दुःखाने माणसासारखा शोक करणाऱ्या माकडिणी, शेळीच्या मुताचा खमंग वास, लुटुलुटु चालत ऊन्ह खायला येणारे कासव, मोरीच्या भोकातून येणारा चिवचिवता तांबूसकोवळा प्रकाश, पांढऱ्या मातीने सारवलेल्या भिंतीत तापवून वाकवलेल्या बांगडीच्या काचा रुतवून केलेली हिरवीगार चमचमती वेल, चांदी पसरल्यासारखे दिसणारे स्तब्ध पाणी, कुणीतरी पलीकडे जावे तशी सहज स्वप्नात जाणारी चिंगुआजी... 

श्रीनिवास कुलकर्णींचं 'डोह' वाचताना किती प्रतिमा पिऊन घ्याव्यात नि किती नाही, असं काहीतरी होत होतं. पण मला किंचित जळफळता रागही येत होता. 

औंदुबर या तीर्थक्षेत्राच्या गावी लेखकाचं बालपण गेलं. त्या काळातल्या आठवणींची ही चित्रं आहेत. त्यांचं लालित्य, प्रतिमांचं सौंदर्य - श्रीमंती, भाषेचा गोडवा आणि अर्थवाहीपण, बघता बघता प्रतिमांच्या पुलावरून अर्थानिरर्थाच्या पल्याड गूढाच्या प्रदेशात नेणारी त्यांची जादू... हे सगळं वादातीत आहे. त्याबद्दल 'डोह' पुष्कळ वाखाणलंही गेलं आहे. त्यातलं वानरांचं, वाघळांचं, गाईम्हशींचं, शेळ्यामेंढ्यांचं, झाडाझुडपांचं, रानावनांचं, दगडमातीचं, ऊनसावल्यांचं, पाखरापिल्लांचं, देवाधर्माचं, माणसांचं आणि सापांचं विश्व लेखकाच्या नजरेनं बघताना स्तिमित व्हायला होतं, स्वप्नात गेल्यासारखं होतं, हे सारं संपूच नयेसं वाटतं... 

पण हे विश्व आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे, आपल्याला ते या शब्दांच्या कृत्रिम खिडकीतूनच बघावं लागणार, तितका आणि तितकाच रस्ता या गेल्या पिढीतल्या माणसांनी शिल्लक ठेवला आहे... असं काहीतरी मला वाटत राहिलं. पुष्कळ श्रीमंत पण उधळपट्टीने खंक होऊन बसलेल्या बेजबाबदार बापाच्या पोटच्या मुलांना वाटावं, तसं. प्रिव्हिलेज्ड असणं वा नसणं हे काय फक्त जतिनिहाय वा आर्थिक स्थितिनिहाय असतं थोडंच? आपल्या आधीच्या पिढ्यांमधली, मन भरून निसर्ग उपभोगलेली आणि आता आपल्याकरता हे सिमेंट-धूर-डॉल्बीचं जग ठेवून गेलेली माणसंही प्रिव्हिलेज्डच असतात. आपली सगळी पिढीच या बाबतीत दलित-वंचित... असा तो राग. 

वास्तविक मी तद्दन शहरी व्यक्ती आहे. मला खेडेगाव आणि तिथल्या आयुष्याचे कढ कदापि येत नाहीत. कुठल्याही मुलानं आपल्या भवतालातल्या, त्याच्याकरता 'नैसर्गिक'च असलेल्या वास्तुविशेषांचे, वस्तुविशेषांचे, माणसा-झाडा-जीवांचे, आणि वासा-आवाजांचे सगळे रंग टिपून घ्यावेत, तसं मी शहर टिपून घेत आले आहे. तोही निसर्गच आहे हे ठासून सांगत, त्याचं जिवंतपण भोगत आले आहे. पुढेही आणि इतर अवकाशांमध्येही माणसं हे करतीलच. पण तरी - हे जे काही श्रीमंत, संपृक्त, व्यामिश्र जग होतं, ते लोपलं हे उरतंच. त्याचा हा विषाद.

श्रीनिवास कुलकर्णींची इतर दोन पुस्तकं वाचताना त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांच्या तुलनेत तरुणपणीच्या अनुभवांमध्ये येत गेलेलं पोकळपण, तेच-ते-पण, बळंच-गूढत्व बघून जरा विटायला झालं. पण त्यानं 'डोह' आणि त्यातल्या विश्वाबद्दल वाटणारा मत्सर कोमट झाला नाही. तो धारदारपणे सलत राहावा, इतकी त्या पुस्तकाची धार जिवंत आहे. 

डोह

श्रीनिवास कुलकर्णी

मौज प्रकाशन

प्रथमावृत्ती १९६५